गेल्या काही दिवसांपासून गूगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे दाखवले जात होते. आता गुगल ने निर्णयात बदल केला....!
-------
: (प्रतिनिधी- विजय पगारे)
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले असतानाच गूगल मॅपने घाई-घाईने शहराचे नाम बदलण्याचा घाट घातला होता. मात्र आता गूगलने केलेले बदल मागे घेतलं आहेत. आधी महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे-भाजप सरकारने या शहरांच्या नामांतराचा निर्णय अग्रक्रमाने घेतला. त्यामुळे नामांतर विरोधी राजकीय पक्षांमध्ये असंतोष आहे. या दोन्ही शहरांच्या नामांतर निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी नामांतर विरोधी समितीतर्फे केली जात आहे. अशातच गूगल मॅपवर अशा प्रकारे बदल केल्यामुळे एमआयएम खासदार इम्तियाज जलील तसेच इतर मुस्लिम नेत्यांनी नाराजी दर्शवली होती. गूगल मॅपविरोधात त्यांनी तक्रार करण्याचा इशारा दिला होता. हा विरोध लक्षात घेता, गूगलवर या दोन्ही शहरांची नावं पूर्ववत करण्यात आली आहेत.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला राज्य सरकारने मंजुरी दिलेली असली तरीही केंद्र सरकारकडे हा मुद्दा प्रलंबित आहे. तत्पूर्वी नामांतर विरोधी समिती राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. तरीही गूगल मॅपवर घाई-घाईने संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यात आले. त्यामुळे औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. गूगलने कोणत्या अधिकाराअंतर्गत हा बदल केला, असा सवाल त्यांनी केला होता.