दापोली: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व 205 वेळा उपोषण करणारे सुशिलकुमार जहांगीर पावरा ह्या आदिवासी शिक्षकाला शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनीच दोषी, भ्रष्टाचारी ,बोगस अधिका-यांना वाचविण्यासाठी कटकारस्थान करून खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले. आदिवासी शिक्षकाला न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री अनिल परब यांना बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दापोलीत देण्यात आले. दापोली नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचे अभिनंदन सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री अनिल परब दापोली येथे आले होते.त्यावेळी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी पालकमंत्री यांची भेट घेतली. यावेळी बिरसा फायटर्सच्या जिल्हाध्यक्षा तथा राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, महेश पवार, राम पवार पवार, शाम पवार ,अस्मिता जाधव ,महेश जाधव व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना बंडखोर नेत्यांनी अनेक सर्वसामान्य माणसांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. हे काही नवीन नाही. विजय दाजी बाईत या दोषी,भ्रष्टाचारी,व बोगस शिक्षण विस्तार अधिकारीला अनेक गंभीर प्रकरणात वाचविण्यासाठी तक्रारदार सुशिलकुमार पावरा उपशिक्षक यांना दिनांक 4 जुलै 2018 रोजी विजय दाजी बाईत यांची चौकशी झाल्यानंतर लगेच दुस-या दिवशी खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवले गेले आहे.एवढे मोठे षडयंत्र विजय दाजी बाईत हे एकटे रचू शकत नाहीत. लोकांकडून माजी मंत्री रामदास कदम व चंद्रकांत कदम जिल्हा परिषद सदस्य यांची षडयंत्रातील नावे समोर आली आहेत.माजी मंत्री रामदास कदम व चंद्रकांत कदम जिल्हा परिषद यांच्या पासून माझ्या जिवीतास धोका आहे अशी तक्रार पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दापोली येथे दिनांक 18/06/2019 रोजी दाखल आहे.जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सुद्धा दिनांक 17/06/2019 रोजी तक्रार दाखल झाली आहे.चंद्रकांत कदम जिल्हा परिषद सदस्य हे दोषी व भ्रष्टाचारी अधिका-यांना वाचविण्यासाठी जिल्हा परिषद सभेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी आंचल गोयल यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करू, असा दबाव निर्माण करून सुशिलकुमार पावरा यांना उपोषणाचे क्षुल्लक कारण दाखवून कारवाई करायला लावले. आदिवासी शिक्षकाला षडयंत्रात अडकवणे व दोषी व भ्रष्टाचारी अधिका-यांना पाठीशी घालणे अशा या बंडखोर नेत्यांच्या कृत्यामुळे जनतेचा शिवसेना पक्षाविषयी चूकीचा गैरसमज निर्माण होत आहे. म्हणून चुकीच्या कामांमुळे शिवसेना पक्षाला बदनाम करणा-या या बंडखोरांना शिवसेना पक्षातूनच काढून टाकण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन वाचून पालकमंत्री अनिल परब यांनी निवेदनातील बंडखोर नेत्यांच्या नावाखाली पेनने अंडरलाईन करून निवेदनावर सही केली.यावेळी पावरा यांचा विषय गांभीर्याने घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले.सध्या शिवसेना बंडखोर नेत्यांचे नाव निवेदनात आल्यामुळे पावरा यांचा विषय पालकमंत्री मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचल्याचे समजते.आदिवासी शिक्षकाला न्याय देण्यासाठी पालकमंत्री अनिल परब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कोणती कार्यवाही करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.